Saturday, January 29, 2011

स्वराज्याची पहिली लढाई


स्वराज्याची पहिली लढाई - ८ ऑगस्ट १६४८

१६४८ च्या सुरवातीला आदिलशाहीचे पुरंदर आणि सिंहगड असे मात्तबर किल्ले शिवाजी राजांनी ताब्यात घेतले. अखेर शिवाजी महाराजांच्या वाढत्या कारवाया लक्षात घेउन आदिलशाहने जुलै १६४८ मध्ये शिवाजी राजांवर हल्ला करण्याचे ठरवले. खुद्द शहाजी राजांची साथ असल्याशिवाय शिवाजी हे धाडस करणार नहीं अशी खात्री असल्याने आदिलशहाने शहाजी राजांना २५ जुलै १६४८ रोजी कपटाने कैद केले आणि शहाजीराजांच्या बंगळूरप्रांती आदिलशाही फ़ौज धाडली. तर एक फ़ौज पुण्याच्या दिशेने चालून आली. शहाजीराजे खुद्द कैदेत होते मात्र बंगळूरवरचा हल्ला त्यांचे थोरले पुत्र संभाजीराजे (शिवरायांचे थोरले बंधू) यांनी यशस्वीपणे परतावला.

दुसरीकडे अवघ्या १८ वर्षाचे शिवाजी राजे आदिलशाही सैन्याला भिडायला सज्ज झाले होते. पुणे - सातारा मार्गावर असणाऱ्या खळत-बैलसर येथे स्वराज्याची पहिली मोठी लढाई झाली. ही लढाई ८ ऑगस्ट १६४८ रोजी झाली. आदिलशाही सरदार फत्तेखानाच्या फौजेचा शिवाजी राजांनी सपशेल पराभव केला. फत्तेखानाच्या ३००० फौजेविरुद्ध खुद्द शिवाजीराजे चालून गेले. ह्या लढाईमध्ये फत्तेखान जबर जखमी होउन पसार झाला. तर पुरंदर-सासवड येथे आदिलशाही सरदार हैबतराव याच्याशी दुसऱ्या एका लढाइत 'बाजी पासलकर' यांना वीरमरण आले.

आदिलशाहीचा पहिला मोठा हल्ला मराठा फौजेने परतावला होता. मात्र नुकतेच बाळसे धरलेल्या स्वराज्यापुढील धोका टाळण्यासाठी आणि शहाजीराजांची सुटका करण्यासाठी शिवाजीराजांनी सिंहगड आदिलशाहीला परत केला.

No comments:

Post a Comment